भिगवण:-
भिगवण येथील २१ वर्षीय तरुणीच्या कथित अपहरण प्रकरणाला आज नाट्यमय वळण मिळाले. सुरुवातीला स्वमर्जीने प्रियकरासोबत गेल्याचे सांगणाऱ्या या तरुणीने आज न्यायालयीन सुनावणीदरम्यान आपली भूमिका बदलत आई व मामाकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली. न्यायालयाने तिची इच्छा मान्य करत तिला कुटुंबाच्या स्वाधीन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण परिसरात निर्माण झालेल्या तणावाला आता विराम मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या प्रकरणाची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी पार पडली. न्यायालयाने तरुणीची स्वतंत्रपणे बाजू ऐकून घेतली आणि तिची स्पष्ट इच्छा जाणून घेतली. यावेळी तिने आपण आई व मामाकडे जाणार असल्याचे सांगितले. सुरुवातीला प्रियकरासोबत राहण्याचा पवित्रा घेतलेल्या तरुणीच्या या बदललेल्या भूमिकेमुळे प्रकरणाला पूर्णतः वेगळे वळण मिळाले आहे.
काही दिवसांपूर्वी भिगवण बाजारपेठेतून तरुणीचे अपहरण झाल्याची तक्रार तिच्या आई व भावाने दाखल केली होती. आईच्या डोळ्यात मिरची पूड टाकून मुलीला जबरदस्तीने पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेनंतर भिगवण परिसरात संतापाची लाट उसळली होती. शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता तसेच जनआक्रोश मोर्चाही काढण्यात आला होता. त्यानंतर तरुणीचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये तिने आपण स्वेच्छेने गेल्याचे म्हटले होते. त्यामुळे तपासात गुंतागुंत निर्माण झाली होती.
या प्रकरणावरून राजकीय वातावरणही तापले होते. आमदार राहुल कुल यांच्यावर विविध स्तरांवर आरोप करण्यात आले होते, तर काही सामाजिक संघटनांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडले होते. त्यामुळे हे प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय ठरले होते.
दरम्यान, पुणे ग्रामीण पोलीस यांनी संयम राखत कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे तपास केला. तरुणीचा शोध घेऊन तिला न्यायालयासमोर सुरक्षितरित्या हजर करण्यात पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सध्या प्रकरणातील इतर कायदेशीर बाबींची पूर्तता सुरू असून पुढील तपास सुरू आहे. तरुणीच्या घरवापसीच्या निर्णयामुळे कुटुंबीयांसह आंदोलकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
























