मोबाईल टॉर्चच्या उजेडात अंत्यसंस्कार करण्याची वेळ; ग्रामस्थांमध्ये संताप
भिगवण:-
इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी येथील ग्रामस्थांच्या नशिबी मरणानंतरही अंधारच असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. येथील स्मशानभूमीत वीजपुरवठा नसल्याने रात्रीच्या वेळी चक्क मोबाईल टॉर्चच्या उजेडात अंत्यविधी उरकावे लागत आहेत. प्रशासनाच्या या उदासीनतेबद्दल परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पाणीसाठ्याजवळ स्मशानभूमी, पण सोयींचा दुष्काळ पडलेला दिसून येत आहे. तक्रारवाडी हे पुनर्वसित गाव असून गावाची स्मशानभूमी उजनी धरणाच्या पाणीसाठ्याजवळ, गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर आहे. ही जागा निर्जन ठिकाणी असल्याने संध्याकाळनंतर येथे पूर्णतः काळोख असतो. गेल्या अनेक वर्षांपासून येथे कायमस्वरूपी वीजपुरवठ्याची मागणी केली जात आहे, मात्र स्थानिक प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. काही वर्षांपूर्वी येथे सोलर दिवे बसवून मलमपट्टी करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, निकृष्ट दर्जा किंवा देखभालीच्या अभावामुळे हे दिवे अल्पावधीतच बंद पडले. संबंधित ठेकेदाराने याची दुरुस्ती करण्याची तसदीही घेतली नाही. परिणामी, ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.
प्रशासनाचा ‘टॉर्च’ कधी पेटणार?
नुकत्याच झालेल्या एका अंत्यविधीच्या प्रसंगी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि गावातील मान्यवर उपस्थित होते. मात्र, स्मशानभूमीत दिवाबत्तीची सोय नसल्याने उपस्थितांना मोबाईलचे टॉर्च लावून अंत्यविधी पार पाडावा लागला. ही बाब अत्यंत दुर्दैवी असून प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढणारी आहे.
स्मशानभूमीपर्यंत कायमस्वरूपी वीजजोडणी मिळावी. बंद पडलेले सोलर दिवे तातडीने दुरुस्त करावेत किंवा नवीन बसवावेत. स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता आणि पिण्याच्या पाण्याची सोय करावी. संवेदनशील मानल्या जाणाऱ्या स्मशानभूमीच्या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन हा ‘अंधार’ दूर करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा, येणाऱ्या काळात आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा तक्रारवाडीच्या ग्रामस्थांनी दिला आहे.

























