भिगवण:
पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी महाबळेश्वर येथे गेलेल्या एका तरुणाला केवळ संशयावरून स्थानिक ग्रामस्थांनी लाकडी दांडके आणि काठ्यांनी बेदम मारहाण करून त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अक्षय रमेश जाधव (वय २५, रा. भिगवण, ता. इंदापूर) असे या मृत तरुणाचे नाव आहे. भोसे (ता. महाबळेश्वर) गावच्या हद्दीत ही दुर्दैवी घटना घडली असून, या प्रकरणी पाचगणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून चार जणांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिगवण येथील अक्षय जाधव हा आपल्या मित्रांसोबत ८ जुलै रोजी महाबळेश्वर परिसरात फिरण्यासाठी आला होता. त्यांनी भोसे गावातील एका लॉजवर मुक्काम केला होता. रात्रीच्या वेळी अक्षय आपल्या खोलीतून बाहेर पडला असता, तो परिसरातील एका घरात डोकावून पाहत असल्याचा संशय काही स्थानिक नागरिकांना आला. या संशयावरून संतप्त झालेल्या काही जणांनी अक्षयला जाब विचारत लाकडी काठ्या, दांडके आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. ही मारहाण इतकी अमानुष होती की अक्षय गंभीररीत्या जखमी झाला.
दरम्यान, लॉजच्या खोलीत अक्षय न दिसल्याने त्याच्या मित्रांनी परिसरात शोध सुरू केला. तेव्हा लॉजपासून काही अंतरावर अक्षय रक्ताच्या थारोळ्यात गंभीर अवस्थेत आढळून आला. मित्रांनी त्याला तातडीने पाचगणी व त्यानंतर वाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती अधिक खालावल्याने त्याला बारामती येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, तिथे पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
तरुणाच्या मृत्यूनंतर बारामती पोलिसांनी प्रारंभी ‘झिरो’ क्रमांकाने गुन्हा नोंदवून तो पाचगणी पोलिसांकडे वर्ग केला. पाचगणी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने कारवाई करत चार मुख्य संशयितांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये सूर्यकांत चंद्रकांत गोळे (रा. भोसे, महाबळेश्वर), अविनाश सतीश भोसले (रा. बावधन, वाई), राहुल जनार्दन राजपुरे (रा. कणूर, वाई) आणि अमोल गंगादेव वाडकर (रा. चिखली, वाई) यांचा समावेश आहे.
केवळ संशयावरून एका २५ वर्षीय तरुणाचा अमानुषपणे जीव घेतल्यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून पाचगणी पोलीस या घटनेचा पुढील सखोल तपास करत आहेत.
























