भिगवण
फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी-देवगड हापूस आंब्याने अखेर महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर भिगवण बाजारपेठेत दिमाखदार प्रवेश केला. स्थानिक आंबा व्यावसायिक संतोष सोनवणे यांच्या ‘ज्योती मँगो’ दुकानात पारंपरिक पद्धतीने पेटी पूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला, त्यानंतर लगेचच लिलावाचे आयोजन करण्यात आले होते.
पहिल्या पेटीला विक्रमी दर
लिलावात पहिली पेटी तब्बल १४,००० रुपयांना ‘हॉटेल ज्योती’चे मालक चंद्रशेखर पवार यांनी खरेदी करत विक्रमी दर नोंदवला तर दुसरी पेटी तेवढ्याच किंमतीला अनुक्रमे डॉ. संजय भोसले, तिसरी पेटी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती पराग जाधव, चौथी पेटी दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक रामदास झोळ, पाचवी पेटी पंचरत्न हॉटेलचे अविनाश गोलांडे तर सहावी पेटी महेंद्र बोगावत यांनी खरेदी केली अशा उच्चांकी दराने प्रतिसाद मिळाल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कमी आवक आणि उच्च मागणी यामुळे सध्या दर उच्च पातळीवर असले, तरी पुढील काही आठवड्यांत आवक वाढल्यास दरात काहीशी घसरण होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
हवामानाचा फटका; केवळ २० टक्केच उत्पादन
यंदा हापूस उत्पादनावर प्रतिकूल हवामानाचा मोठा परिणाम झाला आहे. गणपतीपुळे (मालगुंड) येथील बागायतदार विद्याधर पुसाळकर यांनी सांगितले की, हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे कलमांना पालवी उशिरा फुटली. मोहर आल्यानंतर कडाक्याची थंडी व दाट धुक्यामुळे ‘खार’ पडली, तर थ्रिप्स (तुडतुडे) प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात मोहर गळून पडला. परिणामी यंदा बाजारपेठेत केवळ सुमारे २० टक्केच हापूस उपलब्ध होणार आहे. बदलत्या हवामान पद्धतीमुळे दरवर्षी उत्पादनावर होणाऱ्या परिणामाबद्दल बागायतदारांनी चिंता व्यक्त केली.
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी सचिन बोगावत, चंद्रकांत रायसोनी, भरत मल्लाव, सुरेश पिसाळ, देवानंद शेलार,तुषार क्षीरसागर, संजय खाडे, जावेद शेख, आप्पासाहेब गायकवाड, शिवाजी बंडगर, केदार खडके, रणजीत भोंगळे, संपत बंडगर, प्रवीण वाघ,विकास बंडगर, हर्षवर्धन ढवळे, संजय बंडगर,योगेश चव्हाण,निलेश मोरे, आकाश मांढरे,सोमेश्वर मोरे, शंकर जाधव, अक्षय एकाड, सागर सोनवणे, राहुल चव्हाण, सह इतर क्षेत्रांतील मान्यवर, नागरिक व व्यापाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रशांत चवरे यांनी केले.
उत्पादनात घट झाली असली तरी हापूसच्या वैशिष्ट्यपूर्ण चवीमुळे ग्राहकांमधील मागणी कायम असून भिगवणच्या बाजारपेठेत नवचैतन्य निर्माण झाले आहे.
























