भिगवण :
पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर या तीन जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील महत्त्वाचे दळणवळण केंद्र असलेल्या भिगवण (ता. इंदापूर) येथील बसस्थानकाचा प्रश्न आता अत्यंत गंभीर बनला आहे. बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने प्रवासी, शाळकरी विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सध्या ऊन, पाऊस आणि चिखलाचा सामना करावा लागत आहे. प्रशासकीय अनास्थेमुळे येथील प्रवाशांची मोठी ससेहोलपट होत असून नागरिकांमधून आता तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
भिगवण येथील नवीन सुसज्ज बसस्थानकासह विविध विकासकामांसाठी २२ कोटी २५ लाख रुपयांचा भव्य निधी मंजूर करण्यात आला आहे. जानेवारी २०२६ मध्ये राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन अत्यंत उत्साहात पार पडले होते. भूमिपूजनानंतर प्रशासनाने जुनी इमारत तातडीने पाडण्याची तत्परता दाखवली, मात्र त्यानंतर नवीन इमारतीचे बांधकाम पूर्णपणे बंद पडले आहे.
भिगवण हे इंदापूर, बारामती, दौंड, करमाळा आणि कर्जत या पाच तालुक्यांतील प्रवाशांसाठी मुख्य केंद्र आहे. येथून दररोज सुमारे ३५० ते ४०० एसटी बसफेऱ्या होत असतात, तर अंदाजे ३ हजार ५०० ते ४ हजार प्रवासी रोज या स्थानकाचा वापर करतात. एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर चिखल झाला असून पाण्याचे डबके साचले आहेत.
जुनी इमारत पाडल्यानंतरचा दगड-मातीचा ढिगारा अद्यापही तसाच पडून असल्याने प्रवाशांना बसमध्ये चढताना आणि उतरताना मोठी कसरत करावी लागत आहे. प्रशासनाने उभारलेले तात्पुरते शेड प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत अत्यंत अपुरे पडत असल्याने बहुतांश नागरिकांना उघड्यावरच थांबावे लागत आहे.
परिसरात शाळा आणि महाविद्यालये असल्याने रोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या मोठी आहे. मात्र, बसस्थानकाची हक्काची इमारत नसल्याने व परिसर ओसाड झाल्याने विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांची मोठी गर्दी या मार्गावर होणार आहे. भिगवण हे वारकऱ्यांचे प्रमुख थांबे असल्याने, बसस्थानकाची ही दुरवस्था पाहता वारीच्या काळात वारकऱ्यांचे प्रचंड हाल होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे परिवहन महामंडळाने तात्पुरती मलमपट्टी न करता युद्धपातळीवर बसस्थानकाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
“भूमिपूजन झाले तेव्हा वाटले होते की लवकरच हक्काचे आणि आधुनिक बस स्थानक मिळेल. पण जुनेही गेले आणि नवीनही मिळेना अशी आमची अवस्था झाली आहे. या रखडलेल्या कामामुळे येथील प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत,”
— बॉबी एम. थॉमस , स्थानिक नागरिक

























