भिगवण :
विद्या प्रतिष्ठान अनंतराव पवार इंग्लिश मिडीयम स्कूल चिंचोली च्या दोन विद्यार्थिनींनी राष्ट्रीय स्तरावर आपल्या साहित्यिक प्रतिभेचा ठसा उमटवत शाळेच्या नावाला नवा मान मिळवून दिला आहे. कु. अनुष्का कन्हेरकर आणि कु. रितिका धुमाळ यांच्या हिंदी कविता भारत सरकारच्या उद्योग संवर्धन व व्यापार विभाग अंतर्गत कार्यालय महानियंत्रक (अभिकल्प व व्यापार चिन्ह) यांच्या वतीने प्रकाशित ‘अटल बाल हिंदी कविता संग्रह – २०२५’ या प्रतिष्ठित राष्ट्रीय काव्यसंग्रहासाठी निवडल्या गेल्या असून त्यांच्या कवितांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. युवा पिढीमध्ये हिंदी भाषा आणि साहित्याच्या माध्यमातून सर्जनशील अभिव्यक्तीला चालना देणे तसेच बौद्धिक संपदा हक्क आणि कॉपीराइट संरक्षणाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या उद्योग संवर्धन व अंतर्गत व्यापार विभाग अंतर्गत कार्यालय महानियंत्रक (अभिकल्प व व्यापार चिन्ह) यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी देशभरातून तब्बल ६७५ मौलिक हिंदी कविता प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी उत्कृष्ट १०० बालकवींच्या रचनांची निवड करून त्यांचा ‘अटल बाल हिंदी कविता संग्रह – २०२५’ मध्ये समावेश करण्यात आला. या मानाच्या यादीत विद्या प्रतिष्ठानच्या कु. अनुष्का कनेरकर आणि कु. रितिका धुमाळ यांनी स्थान मिळवत शाळेचा गौरव वाढविला आहे.
विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय यशामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. शाळेच्या हिंदी विभागप्रमुख सौ. मंदा भोसले, सौ. शीतल धुमाळ आणि मुख्याध्यापिका श्रीमती सरिता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी आपल्या सर्जनशील लेखनकौशल्याची उत्कृष्ट छाप पाडली आहे. विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, सचिव नीलिमा गुजर, खजिनदार युगेंद्र पवार यांनी आणि इतर मान्यवर सदस्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या भावी साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रीय स्तरावर मिळालेली ही गौरवाची संधी विद्यार्थिनींच्या लेखनप्रतिभेची साक्ष देणारी असून, त्यांच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही सर्जनशील लेखनाची प्रेरणा मिळणार आहे. विद्या प्रतिष्ठान अनंतराव पवार इंग्लिश मिडीयम स्कूलसाठी हा अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण ठरला आहे.
























